शुक्रवार, १७ जानेवारी, २०२५

काश्मिरी पंडितांची सखोल माहिती देणारे पुस्तक,' काश्मीर आणि काश्मिरी पंडित'


काश्मिरी पंडित भारतीयांसाठी जिव्हाळ्याचा अत्यंत महत्त्वाचा विषय, त्यांचे काश्मीर खोऱ्यातील विस्थापन आणि आणि पुन्हा स्थापनेचे प्रयत्न याविषयी अनेक माध्यमात अनेक व्यक्तींकडून वारंवार बोलण्यात आलेले आहे. मात्र तरी देखील वारंवार चर्चा होणारा विषय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑगस्ट 2019 रोजी काश्मीरमधून 370 कलम हटवल्यावर तर या विषयावर सातत्याने  चर्चा होऊ लागल्या. या चर्चांमध्ये मांडण्यात आलेले मुद्दे योग्य पद्धतीने समजण्यासाठी आपल्याला सर्व विषय काही प्रमाणात माहिती असणे आवश्यक. शिक्षण तज्ञांच्या मते कोणताही विषय मातृभाषेत समजल्यास अधिक उत्तम ठरते.  आपल्या मराठी भाषिकांच्या सुदैवाने  नाशिक जिल्ह्यातील तालुक्याचे गाव सुद्धा नसलेल्या घोटी  या गावातील मधुश्री प्रकाशन आपली ही अडचण दूर करते. मधुश्री प्रकाशनाच्यातर्फे कश्मीर अँड कश्मीरी पंडित  या  मूळच्या इंग्रजी भाषेतील   पुस्तकाचा मराठीत अनुवाद प्रसिद्ध करण्यात आला आहे या अनुवादित पुस्तकांमळे आपणास काश्मिरी पंडित हा विषय सहजतेने आणि सखोलतेने समजतो. नाशिक मधील महत्वाची सांस्कृतिक संस्था असलेल्या सावनाच्या  सहकार्याने मी हे पुस्तक नुकतेच वाचले. 
मुळातील इंग्रजी पुस्तक अशोक कुमार पांडेय यांनी लिहलेले असून त्याचा मराठी अनुवाद चंद्रकांत भोंजाळ यांनी केला आहे. मूळ लेखकाने काश्मीरमधील लोकांना  तसेच काश्मीरमधील समस्येविषयी माहिती असणाऱ्या लोकांना भेटून तसेच संशोधनाचा विचार करता प्राथमिक स्त्रोत आणि द्वितीय स्त्रोत म्हणून त्यांचा उल्लेख करता येईल असा संसाधनांचा उपयोग करत पुस्तक लिहिले आहे पुस्तकाच्या शेवटी जवळपास सहा पानांची संदर्भसूची जोडण्यात आलेली आहे त्यामुळे पुस्तक किती  प्रयत्नपूर्वक लिहिले आहे तसेच पुस्तक किती माहिती पूर्ण आहे हे पुस्तक न वाचता सहजतेने समजून येते.
      440 पानाचा या पुस्तकात 11 प्रकरणाद्वारे आपणास काश्मिरी पंडित यांची माहिती देण्यात आली आहे. काश्मीरमध्ये लोकवस्तीची सुरुवात कोणत्या पद्धतीने झाली काश्मीर विषयी विविध ठिकाणी मुख्यत: आपल्या पुराणांमध्ये आणि इस्लामी संस्कृतीत काय काय सांगण्यात आले आहे याविषयी पहिल्या प्रकरणात सांगितले आहे तर दुसरे प्रकरण काश्मीरमध्ये इसवी सनाच्या सहाव्या शतकापासून ते इस्लामी राजवटीच्या पर्यंत काश्मीरमध्ये कोण कोणते हिंदू राजे होऊन गेले त्यांची राजवट कशी होती?  या काळात काश्मीरमधील ब्राह्मण वर्ग कोणत्या स्थितीत जगत होता ? याविषयी आपणास सांगते. काश्मीर मध्ये इस्लामी राजवट कोणत्या पद्धतीने रुजली काश्मीरमध्ये इस्लामचा प्रसार प्रचार कोणत्या पद्धतीने झाला याविषयीची माहिती  तिसऱ्या प्रकरणाचे वाचन केले असता आपणास मिळते साधारणतः 11 व्या शतकापासून ते 18 व्या शतकात पंजाब मध्ये रणजीत सिंह यांचे साम्राज्य निर्माण होण्यापर्यंतची माहिती या तिसऱ्या प्रकरणात देण्यात आलेली आहे. चौथ्या प्रकरणात आपणास रणजितसिंह यांच्या पराभव होऊन काश्मीर मध्ये डोंगरी राजववस्था कशी प्रस्थापित झाली. डोंगरी राजवटीचा मध्याच्या शेवटचा  काळात म्हणजेच 1935 पर्यंत  काश्मीर पंडितांची स्थिती कशी होती. या कालखंडात काश्मिरी समाजजीवन  कसे कसे आधुनिक होत गेले. काश्मिरी समाज जीवनात सामाजिक सुधारणासुधारणा कसा होत गेल्या याविषयी लेखन आपल्याला माहिती करून देतो.तर पाचव्या प्रकरणात डोंगरी राजवटीच्या मधल्या कालखंडाचा शेवटचा अर्थात 1931 ते 1935 यादरम्यान काश्मीरमध्ये  राजकीय चळवळी कोणत्या पद्धतीने सुरू झाल्या,? त्याचा काश्मिरी पंडितांवर काय परिणाम झाला या  विषय भाष्य करण्यात आले आहे सहाव्या प्रकरणात पाचव्या प्रकरणातील घडामोडी अधिक सविस्तर पद्धतीने सांगण्यात येऊन त्यांना 1947 पर्यंत कोणते वळण मिळाले याविषयी आपणास लेखकाने अवगत केले आहे
     पहिल्या सहा पहिल्या सहा प्रकरणांमध्ये लेखकाने 50% पाने अर्थात 217 पाने खर्ची घातली आहेत. यामध्ये प्रामुख्याने आपणास  काश्मिरी पंडित  हा वर्ग कोणत्या प्रकारे उदस आला. काश्मीरमधील हिंदू ब्राह्मणांना काश्मिरी पंडित ही संज्ञा का मिळाली ? कोणत्या राजवटीत काश्मीरमधील हिंदू ब्राह्मणांना काश्मीरी पंडित ही संज्ञा मिळाली काश्मिरी पंडित सत्तेचा प्रमुख स्थानी कसे आले. प्रशासनातील आपल्या स्थानाचा उपयोग करत कश्मीरी पंडितांनी आणि त्यावेळी काश्मीरचे प्रमुख असलेल्या राजांनी बहुसंख्य मुस्लिमांचे कसे शोषण केले. काश्मीर संस्थान कसे कसे क्षेत्रफळाने मोठे मोठे होत गेले. पंडित नेहरूंच्या घराण्यासारखी काश्मिरी पंडित घराणी कोणत्या स्थितीत
आणि कोणत्या कारणासाठी, तसेच कोणत्या कालखंडात काश्मीरचा बाहेर येऊन सध्याचा उत्तर प्रदेश आणि लगतच्या प्रदेशात आली. काश्मीरमध्ये सामाजिक सुधारणा कोणी सुरू केल्या ब्रिटिश राजवटीत चा आणि भारतातील इतर राज्यात होणाऱ्या घडामोडी यांच्या काश्मीरमध्ये काय परिणाम झाला ब्रिटिश राजवट आणि आणि काश्मीरची डोंगरी घराण्याची राजेशाही आहे यांचे आपसातील संबंध कसे होते? ब्रिटिशांमुळे काश्मिरी समाजात काय काय बदल झाले? काश्मीरचे भारतात पूर्णपणे एकत्रिकरण करण्यात  मोठ्या प्रमाणात अडथळा ठरलेले भारतीय संविधानातील आता रद्द पदाबद्दल करण्यात आलेले 35a हे कलम मुळात 1935 ते 1947 मधील काश्मीरमध्ये राजकीय बदलांमध्ये कोणत्या पद्धतीने समाविष्ट झाले. याविषयी लेखक आपणास माहिती देतो.
    फाळणी परिवर्तन आणि दुर्भाग्य असे शिर्षक असलेल्या २३पानाच्या सातव्या प्रकरणातील दोन अडीच पानाचा अपवाद वगळता संपुर्ण प्रकरण काश्मीरचे भारतातील विलीनीकरणाबाबत माहिती देते‌ काश्मीरी पंडीत या पुस्तकाचा मुख्य विषय असलेल्या विषयी या प्रकरणात अल्पसंख्यांक असलेला, सत्ताधिकांशी धर्माद्धारे नाते असलेला आणि तो पर्यत प्रशासनात महत्तवाची भुमिका असलेला कश्मिरी पंडीत हा वर्ग आता कसा सत्तेपासुन दूर झाला त्याचा राजाश्रय कसा संपला? काश्मीरमध्ये बहुसंख्य असलेला मुस्लिम बांधव कशाप्रकारे सत्तेच्या जवळ आला. डोंगरा राजघराणे हे राजपूत पंजाबी होते एका अर्थाने परकीय होते या परकीय घराण्याची सत्ता संपल्यावर काश्मीरी पंडीतांना सर्वसाधरण काय वाटले? या काश्मीरी पंडीतांच्या बाबी सातव्या प्रकरणात सांगितल्या आहेत.
     आठव्या प्रकरणाचे नाव, 'नवी व्यवस्था जून्या अडचणी' हे आहे ज्यात 1949 ते 1982 या काळात शेख अब्दूला यांनी जम्मू काश्मिरमध्ये राबवलेल्या जमिन सुधारणा कायद्यामुळे  प्रदेशात झालेले सामाजिक बदल ,या बदलांमुळे काश्मिरी पंडीतांमध्ये निर्माण झालेला असंतोष, त्यातून निर्माण झालेले आंदोलने, 370 कलमाबाबत जम्मू आणि काश्मीर या दोन्ही प्रदेशात असलेली भिन्न मते, त्यामागची पार्श्वभूमी, या काळात 370 या कलमांमध्ये करण्यात आलेले बदल, त्यामागची पार्श्वभुमी,झालेल्या निवडणूका, शेख अब्दूला यांची अटक आणि सुटका, झालेले जातीय दंगे,त्या दंग्याबाबतची काश्मीरी पंडीतांची मते,तसेच देशभरात या दंग्याविषयीचे मत, देशभरातील मतामागची कारणमिंमासा,या काळात बदलत गेलेले प्रशासनातील काश्मीरी पंडीत आणि मुसलमानांचे प्रमाण, केंद्र सरकारचे या काळातील काश्मीरमधील धोरण,केंद्रात काश्मीरविषयक असलेली नेहरु आणि  पटेल यांची परस्पराच्या पुर्णत: भिन्न असणारी मते, विविध राजकीय पक्षांचा जम्मू काश्मीरमध्ये झालेला उदय, जनसंघाच्या भुमिकेमागची पाश्वभुमी अस्या विविध बाबींवर चर्चा करण्यात आलेली आहे. 
  नववे प्रकरण पुर्णपणे 1982ते 1987 या दरम्यान इंदिरा गांधी ,राजीव गांधी  या दोन पंतप्रधान आणि त्यावेळचे राज्याचे मुख्यमंत्री फारुक अब्दूला यांनी केलेल्या राजकीय चूका, विधानसभेच्या निवडणूकीत  गांधी घराणे आणि फारुक यांनी केलेले गैरप्रकार, ते उघडकीस आल्याने समाजात केंद्र सरकारविषयी निर्माण झालेला असंतोष
धार्मिक पक्षांनी आंदोलने चूकीच्या पद्धतीने हाताळल्यामुळे संपुर्ण काश्मीरी समाजात गेलेला चूकीचा संदेश,  जम्मू काश्मीरमध्ये या दरम्यानचा काळात उद्भवलेला युवावर्गाच्या बेकारीचा प्रश्न हातळण्यात आलेले अपयश, त्यामुळे समाजात निर्माण झालेल्या असंतोषाला पाकिस्तानकडून देण्यात फोडणी,1984 ते पुढील दोन अडीच वर्षात पंजाबमधील खलिस्तान दहशतवाद्यांनी जम्मुत घेतलेला आश्रय, अफगाणिस्तानमधून सेव्हियत रशियाने माघार घेणे,या सारख्या काही जागतिक घडामोडींचा काश्मीरमधील तरुणांनी घेतलेला अर्थ आणि या सर्वांचा एकत्रीत परीणाम म्हणून 1989च्या सुमारास दहशतवादाचा जन्म या मुद्द्यांना स्पर्श करते‌
     पुस्तकाचे नाव बघितल्यावर ज्या गोष्टीविषयी वाचायला लोक पुस्तक उचलतील असा भाग अर्थात काश्मीर खोऱ्यातून काश्मीरी पंडीतांचे पलायन या अतिशय संवेदनशील मुद्यावर लेखक पुस्तकाच्या अखेरच्या दोन प्रकरणात माहिती देतो.त्यातील शेवटून दुसऱ्या अर्थात दहाव्या प्रकरणात काश्मीर खोऱ्यात अतिरेकी कारवाया त्याच्या सर्वोच्च स्थानी पोहोचल्या असताना अर्थात 1989 ते 1996या काळात झालेल्या राजकीय हत्या, माध्यमात कार्यरत व्यक्तींच्या हत्या,काश्मीरी पंडीतांच्या हत्या, त्यांचे पलायन, अतिरेक्याकडून करण्यात आलेले विविध व्यक्तींचे अपहरण अतिरेक्यांनी सोडवलेले तुरूंगातील त्यांचे सहकारी पाकव्यात काश्मीर मधून काश्मीर मध्ये होणारा शस्त्र पुरवठा, पाकव्याप्त काश्मीरमध्ये होणारे अतिरेक्यांचे प्रशिक्षण, या प्रशिक्षणाविषयी स्थानिक तरूणांना असणारे आकर्षण,ते रोखण्यात अपयश आलेले राज्य सरकार, त्यावेळच्या व्ही पी सिंग सरकारचे गृहमंत्री मुफ्ती यांचा काश्मीरी राजकारणाविषयीचा दृष्टिकोन, मुफ्ती यांचा त्यांचे राज्यांतर्गत विरोधक फारुक अद्बूला यांच्या विरोधाचे राजकारण,काश्मीरी पंडिताच्या पलायनाच्या वेळी राज्याचे राज्यपाल असणाऱ्या जगमोहनसिंग यांची भुमिका, किती पंडीतांनी पलायन केले याबाबत सांगण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या आकडेवारीतील खरेपणा, अनुपम खेर सारख्या मुळच्या काश्मीरी पंडित असलेल्या मात्र व्यवसायानिमित्त खुप आधीच काश्मीर सोडलेल्या व्यक्तींचा याबाबतचा दृष्टिकोन, पंडितांच्या हत्येबाबतची आकडेवारी, यावेळी पंडितांना आलेले काही चांगले आणि वाईट अनुभव, यांची माहिती मिळते. भिती, राग, निराशा आणि काश्मीरी पंडीतांचे पलायन असे शिर्षक असलेल्या या 49 पानी प्रकरणात आधीच्या प्रकरणांप्रमाणेच लेखकाच्या पुस्तक लेखनासाठी केलेले संशोधनातील वैयक्तिक अनुभवांची जोड देण्यात आली आहे.
    शेवटच्या प्रकरणात 50 पानामध्ये जे काश्मीरी पंडित अजूनही काश्मीर खोऱ्यात रहात आहेत,त्यांच्या मुलाखती लेखकाने घेतलेल्या आहेत,मोठ्या संख्येने पंडीतांनी खोरे सोडले तरी त्यांनी का खोरे सोडले नाही याची कारणे या मुलाखतीतून आपणास समजतात.काश्मीरमध्ये असलेली मंदिरे तोडल्याची संख्या वेगवेगळी सांगितली जाते,या मागची सत्यता काय आहे.तसेच काश्मीरमध्ये पुन्हा पंडित वसवण्यात काय अडचणी आहेत? पंडीतांच्या ज्या कॉलनी जम्मूत वसवण्यात आल्या,त्याची स्थिती काय आहे.तसेच पंडितांचे काश्मीरमध्ये पुन्हा पुनर्वसन करण्याबाबत राजकारण कसे खेळले जात आहे.हे  सांगण्यात आले आहे.
काश्मीरच्या समस्येबाबत बोलताना सातत्याने ज्या समाज घटकाचा मुद्दा चर्चेला जातो त्याची विस्तृत सविस्तर माहिती होण्यासाठी पुस्तक किमान एकदा वाचायलाच हवे.


 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी कोणती पद्धत वापरुन पुस्तके निवडतो (माझे वाचन भाग ८)

माझ्या कालच्या लेखावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या त्याबाबद्दल माझा लेख वाचणाऱ्या,यावर प्रतिक्रिया देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. या प्...