सोमवार, ३० मार्च, २०२६

कहाणी अथक परीक्षम,जिद्द कष्टाची आणि विनाकारण झालेल्या अपमानाची ....

यावर्षी मी प्रामुख्याने आत्मचरित्र, चरित्र आणि अनुभव कथन विषयक पुस्तकांचे वाचन करणे ठरवले आहे ,हे एव्हना आपणास माहिती झालेच असेल.  मी आतापर्यंत, 'यस आय एम गिल्टी, बलुतं,  उपरा, लोकवन आनंदवन, डायरी ऑफ ऍना फ्रॅंक ही  पुस्तके वाचली आहेत . याच आत्मचरित्र, चरित्र आणि अनुभव कथन विषयक पुस्तकांच्या साखळीत सहजतेने समाविष्ट होऊ शकेल असे पुस्तक, ' कहाणी लंडनच्या आजीबाईची' सुद्धा मी नुकतेच वाचून पूर्ण केले आहे. माझे आजचे लेखन तुम्हाला या पुस्तकाविषयी सांगण्यासाठी 

तर वाचक मित्रहो , इंग्रजीचा गंध सोडा, धड मराठी सुद्धा न येणाऱ्या विदर्भातील एका पूर्ण अर्थाने अशिक्षित असणाऱ्या राधाबाई बोरकर,  ज्यांना  लंडन देश आहे की एखादे शहर हे सुद्धा माहिती नाही‌‌. त्यांनी जिद्दीने प्रयत्नपूर्वक आणि कष्टाने उभारलेल्या लंडनमधील सुप्रसिद्ध हॉटेलची कथा या सांगण्यात आली आहे.सरोजिनी वैद्य लिखित १८८ पानी या पुस्तकाचे प्रकाशक आहेत राजहंस प्रकाशन.  कष्ट केले की यश मिळतेच हा संदेश आपणांस या पुस्तकातून मिळतो. 

१८ प्रकरणात विभागलेल्या या पुस्तकात आपणास स्वातंत्र्यपूर्व काळात तसेच स्वातंत्र्यानंतरचं सुरुवातीच्या काही वर्षात यवतमाळ जिल्हा आंणि लगतच्या मराठी प्रदेशातील समाजजीवन- लोकजीवन कसे होते ? स्त्रियांबाबतचा दृष्टिकोन कसा होता ? स्त्रियांबाबत अधिक सविस्तर बोलायचे झाल्यास पती निधनानंतरची  स्थिती, बालविवाह, यांची माहिती मिळते . जे काहीसे महिलांबाबत वाईट या श्रेणीत मोडणारे आहे.
महिलांविषयक अश्या काहिस्या प्रतिकूल परिस्थितीचा यशस्वी सामना करत, प्रसंगी जवळपास स्वतःच्या वयाइतकेच वय असलेल्या मुलांची आई होत या मुलांकडून मिळणारी अपमानाची वागणूक मूग गिळून सहन करत कष्टाने मेहनीतीने  लंडनमध्ये  स्वःताचे लॉजिंग आणि हॉटेल यशस्वीपणे उभारलेल्या राधाबाई बोरकर,यांची संघर्ष गाथा आपणास या पुस्तकातून वाचावयास मिळते लंडन शहरात राहत असलेल्या राधाबाई बोरकर यांना तेथील भारतीय त्यातही प्रामुख्याने महाराष्ट्रीयन समाज हा आजीबाई या नावाने ओळखत असल्याने, त्यांच्या या संघर्ष गाथेला ' कहाणी लंडनच्या आजीबाईंची हे नाव देण्यात आले आहे. 

पुस्तकाची रचना हिंदी चित्रपटात दाखवतात त्या प्रमाणे पहिल्यांदा व्यक्तिमत्वाचा सत्कार आणि मग लहानपणापासूनची माहिती अश्या प्रकारे आहे .एलिझाबेथचा शिक्का असे शीर्षक असलेल्या पहिल्या प्रकरणात आजीबाईंची ओळख झाल्यावर दुसऱ्या प्रकरणात त्यांच्या जन्मापासून पहिल्या लग्नापर्यंतचा काळाविषयी माहिती मिळते  तिसऱ्या प्रकरणात त्यांचा पहिला विवाह कोणत्या प्रकारे झाला याची तर  चवथ्या आणि पाचव्या  प्रकरणात त्यांच्या पहिल्या संसाराची आणि पती निधनानंतर दिराने दिलेल्या वागणुकीची, त्यांनी पती निधनानंतर कष्टाने केलेल्या मुलींच्या संगोपनाची माहिती मिळते . सहाव्या प्रकरणापासून अकराव्या
प्रकरणापर्यंत  राधाबाई बोरकर यांच्या दुसऱ्या लगाच्या विषयी माहिती मिळते ज्यामध्ये त्या परिवाराची माहिती,पहिल्या लग्नाचा वेळच्या दिराने जबरदस्ती लावून दिलेले लग्न, त्यांच्या लंडनपर्यतचा प्रवास , दुसऱ्या लग्नाच्यावेळी त्यानं मनुष्याच्या घोळक्यात राहून आलेले रितेपण, दुर्दैवाने त्यांच्या दुसऱ्या पतीचा झालेला मृत्यू दुसऱ्या पतीच्या निधनानंतर सावत्र मुलांनी दिलेली अत्यंत अपमानास्पद वागणूक याची माहिती मिळते. 

आजीबाईंना ज्यामुळे खऱ्या अर्थाने भारतीयांमध्ये सम्मानाची ओळख मिळाली त्या त्यांनी लंडन शहरात  २५ खूप लेन मध्ये उभारलेल्या लॉजिंग आणि हॉटेल विषयीची, त्यांनी ग्राहकांवर केलेल्या मायेची,स्वतःच्या कुटूंबियांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी घेतलेल्या कष्टाची, त्यांनी लंडन शहरात सुरु केलेल्या विविध उपक्रमांची, त्याच्या आयुष्याच्या अखेरच्या काही वर्षाची, त्यांच्या अंत्यविधीची आणि विविध प्रसिद्ध व्यक्त्तिमतांची त्यांच्या विषयीच्या मतांविषयी आपणास १२ ते १८ प्रकरणात माहिती मिळते. 

लेखात सुरुवातीला सांगितले त्या प्रमाणे कष्ट केले की यश मिळतेच हा संदेश प्रत्यक्ष कश्या प्रकारे अस्तित्वात येतो हे समजण्यासाठी लंडनमधील या मराठी भाषिक महिला उद्योजिकेचे हे चरित्र किमान एकदा  तरी वाचायलाच हवे 
 

सोमवार, २३ मार्च, २०२६

प्रत्येक कुमारवयीन मुला- मुलीने वाचलेच पाहिजे असे पुस्तक ' यस आय एम गिल्टी'

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कुमारवयीन टप्पा अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा ठसा त्यांच्या पुढील संपूर्ण आयुष्यावर राहतो. या काळात जर त्यास योग्य संगत न मिळण्यास त्याचे दुष्परिणाम संबधित व्यक्तीलाआयुष्यभर भोगावे लागतात. आयुष्याचे सोने किंवा मातेरे करण्याची ताकद या कुमारवयीन आयुष्यात घडणाऱ्या घटनांमध्ये असते.व्यक्तीला जगाची ओळख  होण्याच्या या काळातील एखादे चुकीचे पाऊल आयुष्याचा नाश करायला पुरेसे असते .असे सातत्याने म्हंटले जाते.आणि या विधानाची साक्ष आपणास पटते ती, मुनव्वर शाह लिखित आणि निराली प्रकाशनतर्फे प्रकशित  ' यस आय एम गिल्टी'   या २०० पानी पुस्तकातून. 

वाचक मित्र,मैत्रीणीनो इसवी सन २०२६ या वर्षात माझ्या वाचनाचा रोख प्रामुख्याने आत्मचरित्र,  चरित्र आणि अनुभव कथन असलेल्या पुस्तकांवर असणार आहे, हे एव्हाना तुम्हाला माहिती झालेच असेल. तर याच साखळीतील एक पुस्तक म्हणून मी हे एका गुन्हेगाराचे अनुभव कथन वाचले. संपूर्ण महाराष्ट्रात त्यातही पुणे शहरात एके काळी खूप चर्चेत असलेल्या जोशी - अभ्यंकर खून खटल्यातील आरोपीने त्याचे अनुभव लिहले तेच म्हणजे हे पुस्तक एक अत्यंत साधा- सरळ, पापभिरू, धार्मिक संस्कारात लहानाचा मोठा झालेला  मुलगा चुकीच्या संगतीमुळे फासावर जातो त्यामुळे आपली सांगत किती महत्त्वाची असते हे आपणास हे पुस्तक स्पष्टपणे दाखवून देते. 

२०० पानी या पुस्तकाची सुरवातीची सुमारे १६ पाने प्रकाशकाचे मनोगत, पूर्वी हे पुस्तक वाचल्याची मनोगते ,या पुस्तकांचे संपादन केलेल्या शुभदा गोगटे यांचे तसेच मुनव्वर शाह यांची  मनोगते या पुस्तकांच्या विक्रीतून येणारे उत्पन्न कोणत्या कामासासाठी वापरले जाते.आणि त्याच कामासाठी का वापरले जाते या पुस्तकाच्या निर्मितीतयोगदान दिलेल्या व्यक्तींचे आभार या सारख्या बाबींवर खर्च करण्यात आलेली आहेत.हा मजकूर ज्या पानावर छापला आहे त्या पानांना क्रमांक क्रमांक देताना त्यांना अक्षरी एक ,दोन तीन असे क्रमांक  दिले आहेत तर  सुरुवातीचा हा भाग संपल्यावर जेथून मुनव्वर आपले अनुभव  मांडायला सुरुवात करतो त्याला १, २, ३, असे अंकी  क्रमांक दिले आहेत अंकी आणि अक्षरी दिलेल्या पानाच्या  क्रमांकाचा एकत्रित विचार करता १७ व्या पानापासून पुस्तक सुरु होते त्यातही सुरवातीची दोन पाने एखादा व्यक्ती एखादा गुन्हा करतो ,यामध्ये  व्यक्तीचे स्वतःचे कर्म आणि दैव प्रारब्ध, देवाची इच्छा या गोष्टींचा किती प्रभाव असतो या  सारख्या बाबींवर आध्यत्मिक दृष्टीने चर्चा केली आहे  अध्यात्मिक बाबींवरील मजकुराबाबत सांगायचे झाल्यास माझा या विषयातील अभ्यास खूपच कमी असेल किंवा मुनव्वरने/ संपादिका शुभदा गोगटे यांनी  तो मुळातच किचकट  भाषेत लिहला असेल मला वैयक्तिकरित्या तो मोठ्या प्रमाणात कंटाळवाणा वाटला असो 

तर ही दोन पाने वाचल्यावर ३ ऱ्या  पानापासून मुनव्वरने  स्वतःविषयी सांगायला सुरवात केली आहे . जे  पान  क्रमांक १४३ पर्यंत आहे पान क्रमांक १४३ ते १४८ पर्यंत मुनव्वरने  सह आरोपीच्या व्यक्तिमत्तविषयी लिहले आहे . त्या नंतरची पाच पाने पुन्हा कंटाळवाणी आहेत ज्यात विविध सुविचार देण्यात आलेले आहेत. त्यानंतर पुस्तक प्रकाशनादरम्यान प्रकाशक शरद गोगटे आणि मुनव्वर यांच्यातील पत्रव्यवहार आणि प्रकाशकास एका गुन्हेगाराचे अनुभव कथन प्रसिद्ध केल्यावर काय काय अनुभव आले याबाबत माहिती देते . 

मुनव्वरने स्वतःच्या आयुष्यावर लिहलेले वाचताना ७३ व्या  पानापर्यंत आपण एखाद्या गुन्हेगाराचे नव्हे तर एखाद्या  सर्वसामान्य व्यक्तीने त्याचे रोजचे लिहलेले अनुभव तर वाचत नाहीना असे वाटावे असे वाटते .

मुनव्वरला ज्यामुळे कुप्रसिद्धी मिळाली तो जोशी - अभ्यंकर खून खटल्याच्या ठळक स्पष्टपणे उल्लेल्ख ७४व्या पानावर होतो तेथून पान क्रमांक १४३ पर्यंत जोशी - अभ्यंकर खून कसा झाला ? त्याला कसे अटक केली ?अटक केल्यावर त्याला कशी वागणूक मिळाली ? अटक झाल्यावर त्याचा दिनक्रम काय होता ? तुरंगात असताना धार्मिक बाबींविषयी अभ्यास करण्याची आवड त्यात कशी निर्माण झाली ?तुरुंग प्रशासनाकडून त्याची पूर्तता कोणत्या प्रकारे झाली या विषयी सांगण्यात आले आहे . 

ज्यांना क्रिमीनल सायकॉलॉजीच्या दृष्टीने या पुस्तकाकडे बघायचे असेल त्यांनी ७४ व्या पानापासून १४८ पानपर्यंतच वाचले तरी चालण्यासारखे आहे .ज्यांना आपण कोणत्या संगतीत राहतो  हे का महत्त्वाचे आहे  या विषयी वाचायचे असेल त्यांनी पान क्रमांक १ पासून ७३ पर्यंत वाचलेले चालू शकते .ज्यांना समाजाचा विचार कोणत्या प्रकारे कार्य करतो या विषयी जाणून घेण्यात स्वारस्थ आहे  त्यांनी पान १६६ पासून शेवटच्या पानपर्यंत वाचावे  ते त्यांना माहिती देणारे असेल .ज्यांना  गुन्हेगार देखील एक माणूसच असतो त्याला देखील भावना असतात हे समजून घेयचे असेल तर त्यांनी पानं  क्रमांक १५४ ते १६५ मध्ये छापण्यात आलेला मुन्नावर शाह आणि प्रकाशक शरद गोगटे यांच्यात झालेला पत्रव्यवहार वाचावा 

 मुन्नावर याने केलेला गुन्हा निंदनीयच होता ज्याची क्षिक्षा त्यास मिळाली .मात्र लेखाच्या सुरुवातीला सांगितलेल्या प्रमाणे आयुष्यात जगताना आपली एखादी छोटीशी चूक आपले आयुष्य कसे पूर्णतः नासवू शकते हे समजण्यासाठी आपण हे पुस्तक वाचलाच यावे 

बुधवार, ४ मार्च, २०२६

समाजाचे दाहक चित्र दाखवून देणारे पुस्तक 'बलुतं'


मी या २०२६ वर्षी प्रामुख्याने आत्मचरित्र,चरित्र वाचण्याचे ठरवले आहे, हे एव्हाना तुम्हाला माहिती झालेच असेल. तर याचा मालिकेत समाविष्ट होणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, दया पवार लिखित 'बलुतं' हे सुप्रसिद्ध विद्रोही साहित्यातील महत्त्वाचे आत्मचरित्र मी नुकतेवच वाचले. समाजाचे दाहक चित्र दाखवून देणारे पुस्तक 'बलुतं' असे त्याचे एका वाक्यात वर्णन करता येईल आपल्याच समाजातील एका घटकाचे आयुष्य किती त्रासदायक आणि कष्टकरी होते याचे मन सुन्न करणारे वर्णन सुमारे २०० पानी पुस्तकात आहे.समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे स्वच्छतेचे काम करून सुद्धा समाज आपल्यातील एकाला कोणत्या प्रकारे हीन वागणूक देत होता हे या पुस्तकाच्या वाचनातून मला पुन्हा एकदा समजले. 
मी एस पी कॉलेजमध्ये शिकत असताना किबे थेटरमध्ये 'तुरुंग देश' हा माहितीपट बघितला होता.त्यावेळी पडद्यावर बघितलेली दाहकता मी या पुस्तकातून पुन्हा एकदा अनुभवली असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. 'हीच आमुची प्रार्थना, माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, हे का आवश्यक आहे हे या आतमचरित्रामुळे मला समजले. शून्यातून विश्व निर्माण करणारा लेखक म्हणजे दया पवार असं सांगत
दलित समाजात जगताना येणाऱ्या अडचणी आपल्यासमोर मांडत त्यावेळच्या त्याकाळच्या लेखकाच्या आयुष्यात घेऊन जाणार पुस्तक असे देखील आपण या पुस्तकबाबाबत म्हणू शकतो.  
या पुस्तकात दया पवार यांनी एका सत्कारप्रसंगी अनेक चित्रपट मालिकांमध्ये दाखवत त्या प्रमाणे स्वतःच्याच आत्मा शरीराच्या बाहेर पडून बोलतो त्या प्रकराची पार्श्वभूमी . वापरात हे लेखन केले आहे समाजातील तथाकथित उच्चवर्णीयांकडून त्यांना देण्यात आलेला त्रास त्यांची झालेली अवहेलना याविषयी त्यांनी पुस्तकात सांगितले आहे. मात्र पुस्तकात कुठेही टीकेचा सूर नाहीबलुतं हे मराठीतील पहिल दलित आत्मचरित्र मानल जात. या पुस्तकान मराठी साहित्यविश्वात दलित साहित्यप्रवाहाची सुरुवात केली. पुस्तकाने दलित समाजाच्या अनुभवांना साहित्यिक मान्यता दिली आणि त्यांच्या आवाजाला प्रतिष्ठा प्राप्त झाली  
. पपूर्वीच्या ग्रामीण जीवनात बलुतं गावातील इतर समाज घटकाची जसे की मराठा,ब्राह्मण  यासाठी काम करत आणि त्याबद्दल
त्यांना जे दिलं जात होतं याबद्दल या व्यक्तींना जे दिले आजच्या असे त्याला बलुतं असे म्हणत अशी विविध माहिती मला पुस्तकवाचनाच्या निमित्ताने झाली . स्वतःची काहीही चूक नसताना बरच काळ समाजातील एका घटकला  विनाकारण अपमानाला कसे सामोरे जावे लागत होते,हे समजून घेण्यसाठी प्रत्येकाने किमान एकदा हे पुस्तक वाचायलाच हवे  

कहाणी अथक परीक्षम,जिद्द कष्टाची आणि विनाकारण झालेल्या अपमानाची ....

यावर्षी मी प्रामुख्याने आत्मचरित्र, चरित्र आणि अनुभव कथन विषयक पुस्तकांचे वाचन करणे ठरवले आहे ,हे एव्हना आपणास माहिती झालेच असेल.  मी आतापर्...