रविवार, २९ डिसेंबर, २०२४

प्राचीन युगातील महाराष्ट्राचा इतिहास जाणून घेण्यासाठी वाचलेच पाहिजे असे पुस्तक, 'मुस्लिमपुर्व महाराष्ट्र'


आपल्या महाराष्ट्र शैक्षणिक बोर्डामार्फत विविध इयत्तांमध्ये  कोणता इतिहास शिकवला जातो एक नजर टाकली तर एक गोष्ट आपणास चटकन आढळून येते ती म्हणजे नर्मदेच्या उत्तरेकडील भागातील इतिहासाचे अधिकचे प्रमाण. उतर भारताचा इतिहास शिकवताना देखील मध्ययुगीन इतिहास अधिक प्रमाणात असतो.त्यामुळे आपण जिथे रहातो त्या महाराष्ट्राचा त्यातही प्राचीन युगाबाबत आपणे काहीसे अनभिज्ञ राहतो. याबाबत माहिती करुन घेण्यासाठी शालेय पुस्तकाच्या बाहेरच्या पुस्तकांचा आपणास आधार घ्यावा लागतो. या अवांतर पुस्तकांमधील महत्त्वाची माहितीपुर्ण पुस्तके म्हणून दैनिक केसरीचे १९३० ते १९४० या दरम्यान ८वर्षे संपादक असलेल्या वासुदेव कृष्ण भावे यांनी लिहलेल्या महाराष्ट्राचा इतिहासावरील पुस्तकांचा समावेश करावाच लागेल. भावे यांनी मुस्लिम आक्रमणपुर्व कालखंडातील महाराष्ट्रावर दोन खंडात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळच्या महाराष्ट्रावर आणि पेशवेकालीन महाराष्ट्रावर प्रत्येकी एका खंडात  पुस्तके लिहली आहेत‌. त्यातील पेशवेकालीन महाराष्ट्रावरील पुस्तक आणि मुस्लिम आक्रमकांच्या आधीच्या महाराष्ट्रावरील पुस्तके  मी नुकतेच वाचली.त्यापैकी पेशवे कालीन महाराष्ट्रावर मी काहीच दिवसापुर्वी लिहले होते ज्याना ते वाचायचे असेल त्यांनी लेखाच्या शेवटी असणाऱ्या लिंकवर क्लिक करावे.मी या लेखात बोलणार आहे.मुस्लिम आक्रमकांच्या आधीच्या महाराष्ट्रावर लिहलेल्या दोन पुस्तकांविषयी .
वरद प्रकाशनातर्फे प्रकाशित या पुस्तकात मुसलमानपुर्व महाराष्ट्र या पुस्तकाचे दोन खंड एकत्रीतपणे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. जे एकमेकांनतर छापण्यात आले असुन दोघांना स्वतंत्र्यपणे १पासुन पृष्ठ क्रमांक देण्यात आलेला आहे. एकाच विषयाची दोन पुस्तके एकाच बायडिंगमध्ये एकमेकांनंतर त्याचे पृष्ठ क्रमांक न बदलता छापण्यासारखे या पुस्तकाचे स्वरुप आहे असो.
या पुस्तकात महाराष्ट्रातील सातवहन, राष्ट्रकुट शिलाहार , बदामीचे चालूक्य,कल्याणचे चालूक्य, वाकाटक, यादव राजघराणे तसेच गोव्यातील कदंब राजघराणे, यांचा राजनैतिक इतिहास तसेच त्यावेळचे सामाजिक जिवन,त्यांची राज करण्याची पद्धत महाराष्ट्रातील सामाजिक स्थिती, त्याकाळात झालेली देवालयांची लेण्याची, शिला मंदिरांची लेण्याची निर्मिती या काळात झालेले ज्ञानवर्धन आणि ज्ञान प्रसार, या काळात असणारे काही ग्रंथकार आणि त्यांचे वाङ्मय, या काळात लोकांकडे असणारी कला कौशल्य आणि लोक उपभोगत असणारा सुखसोई, या काळात झालेला मराठीचा विकास, तसेच या काळातील धर्म आणि पंथ कोणते होते या काळात समाज नियंत्रणाचे कोणते माध्यम वापरले जायचे? या काळात महाराष्ट्र बाहेर कोण कोणती राज्य होती, या काळात भारतातील सर्वसाधारण राज्यव्यवस्था कशी होती महाराष्ट्राबाहेर कोणते राज्य होती याचे यांची माहिती मिळते. दोन्ही खंड एकत्र करून छापलेल्या या सुमारे साडेचारशे पानांचा पुस्तकात 30 प्रकरणाद्वारे लेखकाने ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे

प्राचीन महाराष्ट्रातील राजघराण्यांचची माहिती सांगताना लेखकाने सनावळीच्या ऐवजी, व्यक्तिमत्वाची ओळख, त्यांनी कोणत्या पद्धतीने राज्याची प्रशासनाची व्यवस्था लावली त्यांचे अन्य राज्यांशी कसे संबंध होते? त्यांनी
राज्य विस्तार कोणत्या पद्धतीने केला त्यांच्या राज्य कोणत्या पद्धतीने संपुष्टात आले एक राजघराणे नष्ट झाल्यावर त्याची जागा दुसऱ्या राजघराण्याने कसी घेतली? राजघराण्यांनी अन्य राज घराण्यांना कोणती  मदत केली. त्यांच्या समाजाविषयीचे दृष्टिकोन त्यांनी उभारलेल्या किंवा उभरण्यास मोठ्या प्रमाणात मदत केलेल्या विविध लेण्या शिवमंदिरे यांची माहिती दिली आहे. अर्थात या पुस्तकात काही सनावळ्या आहेतच. मात्र पुस्तकात वर्णनात्मक लेखन जास्त प्रमाणात आहे.सनावळ्या या त्या आपणास पुस्तकाच्या पहिल्या भागातच मुख्यत आढळतात. पुस्तकाचा दुसरा भागात पहिल्या भागाच्या तुलनेत सनावळींची संख्या खूपच कमी आहे
पुस्तकाचा दुसऱ्या भागात तत्कालीन समाजाचे वर्णन करत असताना लेखकाने त्यावेळी उभारण्यात आलेल्या , लेण्या शीला मंदिर यांची माहिती  दिली आहे. याच भागात लेखकाने जैन धर्मिय आणि बौद्ध धर्मीयांचा प्रभाव या काळात कोणत्या प्रमाणात होता?  महाराष्ट्रात जैन धर्मीयांपेक्षा बौद्ध धर्मीयांची  संख्या जास्त का आहे ? यावर देखील प्रकाश टाकला आहे
पुस्तक अत्यंत माहितीपूर्ण असून ज्याला  आपल्या महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास जाणून घ्यायचा आहे त्याने हे पुस्तक किमान एकदा तरी वाचणे आवश्यक आहे.



 पेशवेकालीन महाराष्ट्र या पुस्तकाची मी करुन दिलेली ओळख वाचण्यासाठी पुढिल लिंकवर क्लिक करा.

https://ajinkyatartebookreview.blogspot.com/2024/12/blog-post_20.html

बुधवार, २५ डिसेंबर, २०२४

आजच्या तंत्रज्ञानाची सविस्तर ओळख करुन देणारे पुस्तक, 'अर्टिफिशियल इंटेलिजियन्स'

      सध्या आपल्यापैकी अनेकांचा दिवस ए.‌आय. हा शद्ब कूठेना कुठे ऐकल्याशिवाय जात नसेल .ए.आय.ने ने जीवनाच्या जवळपास सर्वच क्षेत्रात प्रवेश केल्याचे चित्र आपणास दिसतयं. आता ए.आय.अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजियन्स, हे तंत्रज्ञान मुळात काय आहे? हे तंत्रज्ञान कोणत्या प्रकारे काम करते,? यंत्रामध्ये कोणते घटक असले म्हणजे आपण ए.आय.चा वापर करत असलेले यंत्र वापरतोय असे म्हणू शकतो. आपल्याला होतोयं त्या पेक्षा वेगळा असा ए.आय.चा उपयोग इतर व्यक्तींना होत असेल का? ए.आय. तंत्रज्ञानाचा विकास कधीपासून सुरू झाला, आतापर्यत ए.आयच्या विकासातील टप्पे कोणते?भविष्यातील ए.आय.ची वाटचाल कशी असेल.?यामुळे कोणते सामाजिक प्रश्न निर्माण होतील? त्यावर कोणते उपाय करता येईल ? भविष्यातील धोके ओळखून आताच पाउले उचलायला सुरवात झाली आहे?या सारखे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने आपल्या मनात येत असतील. मनात आलेल्या या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आपण प्रयत्न करात असाल त्यात काही प्रश्नांची उत्तरे मिळाली देखील असतील.मला देखील यासारखे काही प्रश्न पडले होते.त्याची उत्तरे शोधताना मला एक खजिना गवसला.या खजिन्यामुळे माझ्या सर्व ए.आय विषयक प्रश्नांची उत्तरे मिळाली.बुकगंगा प्रकाशनातर्फे प्रकाशित, अच्युत गोडबोले लिखीत आर्टिफिशीयल इंटेलिजियन्स नावाचे ४०२पानाचे पुस्तक, हे त्या खजिन्याचे नाव.
        या ४०२पानाच्या पुस्तकात इतिहास, संकल्पना, आर्टिफिशयल इंटेलिजियन्सचा उपयोग भाग १  आर्टिफिशियल इंटेलिजियन्सचा उपयोग भाग२, ए.आय.चा भविष्यवेध आणि मशिन लर्निंग (सखोल विवेचन ) या सहा प्रकरणाद्वारे लेखकाने लेखाच्या सुरवातीला उल्लेख केलेल्या प्रश्नाची उत्तरे दिली आहेत.शेवटचे मशिन लर्निग (सखोल विवेचन) हे प्रकरण वगळता अन्य सर्व प्रकरणाची भाषा आठवी, नववी पास विद्यार्थ्याला समजेल या प्रकारची आहे.शेवटच्या प्रकरणाची भाषा काहिसी कठिण आहे.या शेवटच्या प्रकरणात अनेक तांत्रीक संकल्पना समजावून सांगितलेल्या आहेत.३५पानाच्या या शेवटच्या प्रकरणात तांत्रीक संकल्पना असल्याने या प्रकरणाची भाषा कठिण झाली आहे. अच्युत गोडबोले यांनी आपल्या प्रास्ताविकात ज्यांना तांत्रिक विषयात शिरायचे नाही.त्यांनी तो भाग नाही वाचला तरी चालेल असे सांगितले आहेच.
  सहावे प्रकरण वगळता अन्य सर्व प्रकरणे उप प्रकरणात विभागली आहेत.इतिहास या पहिल्या प्रकरणात आर्टिफिशियल इंटेलिजियन्स या आणि रोबॉटिक्स याचा इतिहासात समजते. संकल्पना या  दुसऱ्या प्रकरणात अच्युत गोडबोले यांनी, ए.आय.मशिन लर्निंग,डीप लर्निंग,एक्स्पर्ट सिस्टीम, नॅचरल लँग्वेज  प्रोसेसिंग, ए आय,  चॅटबॉक्स, चॅटजीपिटी, सेल्फ डायव्हिंग कार्स आणि ऑटोनॉमस वाहन यांची ओळख आपल्याला करुन दिली आहे. आर्टिफिशयल इंटेलिजियन्सचा उपयोग भाग १आणि २ या अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या प्रकरणात आपणास ए.आय चा उपयोग कंपन्यांमध्ये  कारखान्यांमध्ये, ऑफिसेसमध्ये, फायनान्समध्ये, अकाउंटमध्ये कस्टमर केअर सर्विसमध्ये, मार्केटरिसर्चमध्ये, रिटेलमध्ये, सेल्स आणि मार्केटिंगमध्ये, आरोग्य सेवेत, शिक्षणात, वकिलांसाठी, शेतीमध्ये, मासेमारीमध्ये, पर्यटनामध्ये, विविध कलांमध्ये, संगीतात, पत्रकारितेमध्ये, लीडरशिपमध्ये, अंतराळ संशोधनात,प्रिंटिंगमध्ये  स्मार्टफोनमध्ये कोणत्या प्रकारे होऊ शकतो? तसेच भारतीय उद्योजकांनी आर्टिफिशियल  इंटेलिजियन्सचा वापर कोणत्या प्रकारे करावा, याविषयी अच्युत गोडबोले यांनी चर्चा केली आहे‌.सर्वसामन्यांचा ज्यांना तंत्रज्ञानाची विशेष ओळख नाही अस्या व्यक्तींसाठी शेवटच्या अस्या पाचव्या  ए.आय.चा भविष्यवेध या प्रकरणात ए.आय आणि उद्याच जग , नोकऱ्या, आणि युनीव्हर्सल बेसिक इनकम या मुद्द्यांवर प्रकाश पाडला आहे.
सध्या ए.आय हा उत्तम करीयर पर्याय म्हणून समोर येत आहे. ज्यांना ए.आय.या क्षेत्रात करियर करायचे आहे.त्यांनी माझ्यामते या पुस्तकाचे वाचन करताना प्रकरण क्रमांक २,६,३,४,५,१ या प्रमाणे वाचन करावे.त्यांनी पहिले प्रकरण नाही वाचले तरी चालेल.  ज्यांना फारसे तांत्रीक ज्ञान नाही.त्यांना शेवटचे प्रकरण मोठ्या प्रमाणात त्रासदायक वाटू शकते.असो.
     कोणतेही तंत्रज्ञान वापरताना, त्यामागचे  विज्ञान समजणे आवश्यक नसले तरी ते समजल्यास तंत्रज्ञान वापरताना होणारा आनंद शब्दात मांडता येणे अशक्यच.तरी त्या आनंदाची अनुभुती घेण्यासाठी हे पुस्तक किमान एकदा तरी वाचलेच पाहिजे.

सोमवार, २३ डिसेंबर, २०२४

मुळातून नैसर्गिकशास्त्र शिकवणारे पुस्तक, 'किमयागार'

 
        आपल्याकडे वारंवार मराठी भाषा टिकली पाहिजे,असा घोष लावला जातो. मात्र सध्याचा २१व्या शतकात  भाषा  किती जुनी आहे.तीला अभिजात दर्जा आहे का? यापेक्षा त्या भाषेत किती ज्ञाननिर्मिती होते.यावरच भाषा वाढणार आहे. हा महत्तवाचा मुद्दा मराठी भाषा हितचिंतकांकडुन दुर्लक्षिला जातो. फारच थोड्या व्यक्ती मराठी भाषा ज्ञानवर्धक होण्यासाठी प्रयत्नशील राहतात.या मोजक्या व्यक्तीमध्ये समाविष्ट होणारे नाव म्हणजे 'अच्युत गोडबोले'. आतापर्यत अच्युत गोडबोले यांनी मराठी भाषेत आतापर्यत विविध विषयांवर सविस्तर माहिती देणारी पुस्तके लिहली आहेत.जी सर्वच्या सर्व बेस्ट सेलर ठरली आहेत. त्यातीलच एक असलेले 'किमयागार' हे पुस्तक मी ंनाशिकमधील सर्वात जूने सार्वजनिक वाचनालय असलेल्या 'सावाना'च्या मदतीने वाचले. मनूष्य कोणत्याही जाती,धर्माचा आस्तिक अथवा नास्तिक असो, त्याच्या आयुष्यावर परिणाण करणाऱ्या 'नैसर्गिक शास्त्रांच्या भौतिकशास्त्र (फिजिक्स ),रसायनशास्त्र (केमिस्टी) पृथ्वी विज्ञान (अर्थ सायन्स), जीवशास्त्र (बायोलॉजी) या शाखांची ओळख करून देण्यात आली आहे.
                 संदर्भ सुची आणि व्यक्तीनाम सुची तसेच सुरवातीच्या प्रास्ताविकाची नावे वगळता ५६९ पानांच्या या पुस्तकात आपणास, प्राचीन भारताच विज्ञानाचे योगदान,प्राचीन ग्रीक शास्त्रज्ञ, युरोपाती प्रबोधनाच्या सुरवातीच्या काळातील शास्त्रज्ञ,चौथी मिती (फोर्थ डायमेशन) न्यूक्लिअर सायन्स,क्वांटम मेकॅनिक्स,
आईन्स्टाईनची जनरल थेअरी, आईन्स्टाईन ची स्पेशल थेअरी ऑन रेलेटिव्हीटी, रेडिओलॉजी रेडिओ ऍक्टिव्हिटी यांचे संशोधन कसे झाले?, बिग बँग थेअरी आणि स्टेडी युनिव्हर्स थेअरी, स्टिंग थेअरी, क्वार्स पार्टिकल्स, पृथ्वीचा जन्म,आणि आतापर्यतची वाटचाल, पृथ्वीची अंतर्गत रचना, पृथ्वीची सर्वसाधरण माहिती,  वेगनरची थेअरी,भुकंप,ज्वालामुखी,रसायनशास्त्राचा विकास कोणत्या प्रकारे झाला? ऑर्गनिक केमिस्टीचा विकास, रसायनशास्त्रातील महत्तवाचे शास्त्रज्ञ,  त्यांनी काय संशोधन केले कसे केले? बायोलॉजीमधील संशोधनाचे विविध टप्पे, व्हायरस, बॅक्टेरिया,डार्विनचा उत्क्रांतीविषयक सिद्धांत आणि त्याची आतापर्यतची वाटचाल,अनुवंशिकता,डीएनए,जेनेटिक कोड,ह्युमन जिनोम कोड,डबल हेलिक्स आदि विविध विषयांवर सखोल माहिती मिळते.
      अच्युत गोडबोले यांच्या अन्य लेखनाप्रमाणे याही पुस्तकाची भाषा सर्वसाधरण शिक्षण झालेल्या व्यक्तीला देखील समजेल असीच आहे.पुस्तकात योग्य त्या ठिकाणी आकृत्या, उदाहरणांचा वापर करण्यात आला आहे,त्यामुळे विषय चटकन समजतो. पुस्तकाच्या शेवटी व्यक्तीनाम सुची देण्यात आली आहे.ज्यामध्ये एखाद्या
व्यक्तीचे नाव पुस्तकात कोणकोणत्या पानावर आले आहे,याची यादी देण्यात आलेली आहे.सच पुस्तकाच्या सुरवातील अनुक्रमणिका देखील सविस्तर देण्यात आली आहे‌ ज्यामुळे आपणाष एखादा संदर्भ हवा असेल तर चटकन सापडतो.या पुस्तकात सर्वसामान्य व्यक्तीला प्रत्येक विषयाची किमान ओळख व्हावी,याची काळजी घेतल्याचे स्पष्टपणे जाणवते.या पुस्तकात  विषयाचे बारीकसारिक सविस्तर तपशील फारच कमी देण्यात आले आहेत.या पुस्तकातून विषयाची तोंड ओळख करुन घेवून विषयाचा सविस्तर अभ्यासासाठी दुसरे पुस्तक वाचणे योग्य ठरेल.
कोणतीही नविन गोष्ट व्यक्तीला त्याचा मातृभाषेत शिकवल्यास, सहजगत्या समजते. कोणत्याही गोष्टीच्या मुलभुत संकल्पना मातृभाषेत समजावून घेवून, त्या गोष्टीचे सविस्तर ज्ञान दुसऱ्या भाषेत घेतल्यास अधिक उत्तम असे शिक्षणतज्ञ वारंवार सांगत असतातच.त्यामुळे नैसर्गिक शास्त्रांचा संकल्पना समजावून घेण्यासाठी किमान एकदा आपण हे पुस्तक वाचायलाच हवे.

शनिवार, २१ डिसेंबर, २०२४

खरे खुरे आत्मचरीत्र .... स्मृतिचित्रे

    आपल्या मराठीत आत्मचरित्रांची मोठी परंपरा आहे. मात्र बहुसंख्य आत्मचरित्रात स्वत:चे दोष मान्य करा सोडाच,आपल्यात मुळात नसणारे चांगले गुण स्वत:ला चिकटवलेले दिसतात.फारच कमी आत्मचरित्रात आपले खरे आयुष्य रेखाटलेले स्पटपणे जाणवते.संख्येने मोजके असलेल्या या आत्मचरित्रात ठळकपणे आपले लक्ष्य वेधून घेते, लक्ष्मीबाई टिळक यांचे आत्मचरित्र ' स्मृतिचित्रे'. कोणतेही भाषिक पांडित्य न दाखवता सहजसोप्या मराठीत सुद्धा किती सकस लिहता येते, हे बघायचे असल्यास या आत्मचरित्राखेरीज दुसरे पुस्तक मराठीत सापडणे, काहीसे अवघडच म्हणता येईल.आपण आपलेच आत्मचरित्र तर वाचत नाही ना, असे वाटावे इतका सत्यपणा या ५९१ पानांच्या पुस्तकात पदोपदी जाणवतो. जगात कोणीही सुपर ह्युमन म्हणून जन्माला येत नाहीत.आपल्या रोजच्या आयुष्यात ज्या अडचणी आपणास अनुभवायला येतात,त्याच प्रकारच्या अडचणी अनुभव मोठमोठ्या व्यक्तींना देखील येतात. मात्र या अडचणीतून मार्ग काढताना त्यांनी वेगळे मार्ग अवलंबल्यामुळे किंवा अनुभवातून आपल्यापेक्षा अधिक चांगला अनुभव गाठीसी धरल्यामुळे त्या व्यक्ती महान होतात, हे आपणास या पुस्तकाच्या वाचनातून समजते. लग्नानंतर अक्षर ओळख झालेली ओळख झालेली स्त्री किती उत्तम साहित्यीक, परिचारीका होवू शकते,हे अनुभवण्यासाठी आपण सर्वांनी हे पुस्तक किमान एकदा तरी वाचायलाच हवे.
     आचार्य अत्रे यांनी लक्ष्मीबाई टिळक यांना 'साहित्यलक्ष्मी' ही उपमा दिली होती,ती कशी खरी होती,हे आपल्याला या पुस्तकातून समजते‌ ९१ प्रकरणातून कोणतेही रूढ अर्थाचे शिक्षण न घेता, कठीण परिस्थितीशी लढा देवून आपले व्यक्तीमत्व दुसऱ्यांना आदर्शवत वाटेल,असे कोणत्या पद्धतीने घडवू शकते,हे या पुस्तकातून आपल्यास समजते. 
लक्ष्मीबाई टिळकांच्या आयुष्यातील बराच मोठा भाग नाशिकला गेला.नाशिक माझी जन्मभुमी असल्याने मी सुद्धा नाशिकला बराच काळ राहिलो आहे.तरी सुद्धा नाशिकचे नवे दर्शन मला या पुस्तकाच्या वाचनाने झाले.लक्ष्मीबाईंच्या वेळचे नाशिक अनुभवणे माझ्यासाठी सुद्धा वेगळाच आनंद देणारा अनुभव होता.
लक्ष्मीबाईंनी या पुस्तकाचे लेखन करताना फक्त स्वत:चे अनुभवच सांगितले आहे,असे नाहीये‌. तर १८६० ते १९२० या दरम्यानचे आपल्या महाराष्ट्राचे बदलते  सांस्कृतिक जीवन सुद्धा लेखनातून उलगडले आहेत.एका अर्थाने हा महाराष्ट्राचा त्यावेळचा चालता बोलता इतिहास आहे,असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. साधरणत: लग्नानंतरचे भावविश्व त्यांनी यात मांडलेले आहे अर्थात थेट लग्नापासूनच सुरवात केली असे नसून लग्नासाठी स्थळ बघण्यापासूनचे आपले अनुभव यात सांगितले आहेत.
मी पुण्यात काही निमित्ताने मंडईतून बाजीराव रोडने पायी सारस बागेकडे जात असताना, केळकर संग्राहलयाजवळ एके ठिकाणी फुटपाथावर 'स्मृतिचित्रे' विकताना दिसले, आणि मी लगेच विकत घेतले.जसे झटकन विकत घेतले.तितक्याच झटकन वाचून देखील टाकले. त्यामुळे मला एक उत्तम पुस्तक वाचल्याचा अनुभव आला.तसा तो तूम्हाला येण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचावे 

शुक्रवार, २० डिसेंबर, २०२४

प्रत्येक इतिहासप्रेमींनी संग्रही ठेवावे,असे पुस्तक, 'पेशवेकालीन महाराष्ट्र'

   
 आपल्यापैकी अनेकांना शालेय जीवनात इतिहास हा विषय आवडत नाही.कंटाळवाणा वाटतो.याचे महत्त्वाचे कारण तो म्हणजे राजकीय इतिहास असतो. इतिहासात वेळोवेळी राज्य केलेल्या व्यक्तींविषयी, त्यांनी केलेल्या युद्ध, लढाया आणि तह करार यांच्या विषयीची माहिती त्यात दिलेली असते. त्यांनी राज्य केले त्यांची माहिती जाणून आता काय उपयोग?या विचारातून इतिहासाकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र ही इतिहासाची एक बाजू झाली.त्या राज्यकर्त्यांनी ज्या समाजावर राज्य केले,त्या समाजाचा देखील एक इतिहास असतो. जसे एखाद्या प्रदेशातील राजकर्ते बदलतात, तसे हा इतिहास देखील बदलतो.त्यामुळे एखाद्या प्रदेशाचे संपुर्ण  आकलन होण्यासाठी त्या प्रदेशाचा राजकीय इतिहासाबरोबर सामाजिक इतिहास देखील आवश्यक ठरतो.,आणि तो जर आपलाच प्रदेश असेल तर विचारायलाच नको.आपले पुर्वज कोणत्या स्थितीत राहत होते.त्यांच्यापेक्षा आपण कोणत्या पद्धतीने वेगळे रहात आहोत?हे समजले तर सोन्याहुन पिवळे.आपल्या प्रदेशातील सामाजिक इतिहास समजला तर आपल्याला आपण कोण आहोत,हे सहजतेने समजते आपलीच आपल्याला नवी ओळख होते.आपल्या महाराष्ट्राचा बाबत बोलायचे झाल्यास, आपली ही गरज सहजतेने पुर्ण होते ती इसवी सन १९३० ते १९४० या दरम्यानचे विविध कालखंड एकत्रीतपणे विचारात घेता ८ वर्ष दैनिक केसरीचे संपादक असलेल्या वा. कृ. भावे यांनी लिहलेल्या, 'पेशवेकलीन महाराष्ट्र, महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास' या ग्रंथामुळे.जो मी नुकताच नाशिकमधील महत्त्वाची सांस्कृतिक संस्था असलेल्या सावानाच्या मदतीने वाचला.
         या ४५८ पानी ग्रंथात शिक्षणपद्धती,नगररचना, इमले‌ देवालये,मुर्तीकला  व चित्रकला, दास-दासी,  वैद्य व वैद्यक्रिया ,कवी व कीर्तनकार,समाजाची मनोरचना, व्यापार व उद्योगधंदे या सारख्या 31 घटकाद्वारे पेशवेकालीन महाराष्ट्राची आपणास ओळख  करुन दिली आहे..पुस्तकाची प्रथम आवृत्ती जरी १९५६साली प्रसिद्ध झालेली असली,तरी पुस्तकाचे बहुतांस लेखन १९३५साली करण्यात आल्याने पुस्तकाची भाषा त्यावेळच्या ग्रंथप्रामान्यानुसार आहे.मात्र तरी देखील भाषा सहजतेने समजते.(निदान मला तरी)
     पेशवे कालखंड आपल्या महाराष्ट्राचा विचार करता अत्यंत महत्तवाचा आहे. आपल्या भारतासाठी मध्ययुग १८५७पर्यत मानण्यात येते.त्याचा विचार करता मध्ययुगाच्या अखेरीस समाजजीवन कसे होते? तसेच कोणत्या प्रकारच्या समाजजीवनाद्वारे आपला अर्वाचीन (मॉडर्न इतिहास) इतिहास सुरू झाला ?तसेच छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज यांच्या दुर्देवी निधनानंतर महाराष्ट्राची सामाजिक व्यवस्था कोणत्या प्रकारची होती?‌हे समजण्यासाठी आपणास पेशवे कालखंड महत्त्वाचा ठरतो. पेशवे कालखंडाच्या अखेरच्या टप्प्यात बंगाल राज्यात ब्रिटिश राजवट सुरु झाली होती {1756 आणि 1765साली अनुक्रमे प्लासी आणि बक्सरची लढाई झाली.ज्यामुळे बंगालमध्ये ब्रिटीश सत्ता आली असे समजण्यात येते. या दरम्यान 1761 साली पानिपतचे तिसरे युद्ध झाले .तसेच इस्ट इंडीयाचे भारताचे शासन अभ्यासताना आपणास 1783चा रेग्युलेटिंग ॲक्ट दिसतो याचवेळी पुण्यात नारायण पेशव्याचा खुन झाला} त्यामुळे ब्रिटीश राजवट येण्याचा वेळची महाराष्ट्राची स्थिती समजण्यासाठी आपणास पेशवे कालखंड अत्यंत महत्त्वाचा ठरतो. ध चा मा करणे,अटकेपार झेंडा रोवणे, पानिपत होणे यासरख्या आता सहजतेने वापरत असलेल्या म्हणींचा उगम हा पेशवे कालखंडातील घटनांपासून झाला आहे.त्यामुळे पेशवे कालखंड आपणासाठी महत्त्वाचा  ठरतो.
    पेशवे कालावधीत स्वधर्मनिष्ठा आणि परधर्म सहिष्णुता कोणत्या प्रकारची होती?त्यावेळेस पाणीपुरवठाविषयक आणि इतर लोकोपयोगी कामे कसी पार पाडली जात? व्यापार उद्योगधंदे यांची आणि लोकांची स्थिती,समाजाची मनोरचना कसी होती?त्यावेळेस ग्रंथसंग्रह आणि ग्रंथवाचन ,गायन,वादन,नर्तन, कसे केले जात?त्याकाळातील सत्पुरुषाची  समाजसेवा,ग्रामव्यवस्था,जमीन महसुल पद्धती,मुलकी खाते,शेतकी खात्याच्या पद्धती,इतर राज्यव्यवस्थांची स्थिती कोणत्या प्रकारची होती?त्या काळात काशीयात्रेची स्थिती कशी होती?त्या काळातील स्वदेशी कापड आणि कपडे कसे असत? त्याकाळी दरबार आणि सणसमारंभ कोणत्या प्रकारचे असत?याची माहिती आपणास पुस्तक वाचताना मिळते.लेखकाने अखेरच्या ३२व्या प्रकरणात उपसंहार करताना, उत्तरेत अथवा दक्षिणेत ज्या प्रकारे भव्य बांधकामे आढळतात,त्या प्रकारची बांधकामे महाराष्ट्रात का आढळत नाही,यावर भाष्य केले आहे.महाराष्ट्रात पितृतुल्य समजल्या जाणाऱ्या न.चि.केळकर यांची ग्रंथाच्या गौरव करणारी प्रास्ताविका हा ग्रंथ किती अभ्यास करुन कष्ट घेवून तयार केला आहे.न.चि केळकर सारख्या श्रेष्ठतम व्यक्तीने कौतूक केलेला हा ग्रंथ आहे.
    आपल्याकडे पेशव्यांचा राजवटीबाबत अनेकांना राग आहे.पेशवाईत काही समाज घटकांवर अन्याय झाल्याचे दाखले देण्यात येतात‌.पेशवाईत विनाकारण होणाऱ्या खर्चाबाबत विविध दावे करण्यात येतात, त्यातील सत्यता बघण्यासाठी प्रत्येकाने हा ग्रंथ किमान एकदा तरी वाचायलाच हवा.

रविवार, १५ डिसेंबर, २०२४

नटसम्राट..‌.आयुष्याची दाहकता थेटपणे उलगडवून दाखवणारे नाटक

           
              आपल्या मराठीला अनेक अजरामर साहित्याची परंपरा लाभलेली आहे.जी जिवनाच्या प्रत्येक अंकाला आपले मराठी साहित्य स्पर्श करते.साहित्याचा सर्वच प्रांतात जसे कथासंग्रह, कांदबरी,‌निबंधवजा लेखन,काव्यसंग्रह अगदी नाटकांमध्ये सुद्धा आपल्याला हा ठसा उमटलेला दिसतो.आपल्या मराठीत अनेक धीरगंभीर विषय देखील नाटकांनी यशस्वीरीत्या समाजापुढे आणले आहेत. याच मालिकेत समाविष्ट होवू शकणारे अजरामर नाटक म्हणजे 'नटसम्राट'.माझ्याकडे हे पुस्तक २००४ पासून आहे‌.मी हे पुस्तक अनेकदा वाचलयं. १५ डिसेंबर रोजी घर आवरताना मला हे पुस्तक दिसले,असो .
              तरुणपणी अत्यंत यशस्वी असलेल्या मात्र म्हातरपणात सर्वकाही मुलांकडे सोपवल्याने कफल्लक झालेल्या एका नटाची कथा या नाटकात सांगण्यात आल्याचे आपणास माहिती असेलच. माझ्यामते या नाटकाचे थोडक्यात वर्णन करायचे असल्यास गुरुदत्त या दिग्दर्शित केलेल्या प्यासा या चित्रपटातील 'जाने वो कैसै लोग थे,जिनको प्यार को प्यार मिला, जब हमने कलीयां मांगी काटांका हार मिला' हे गाणे योग्य

ठरेल.दोन्ही ठिकाणी त्यांचा अपेक्षाभंगच दिसतो. तो देखील आपल्याच जवळच्या व्यक्तींकडून तसेच दोन्ही वेळेस आधार मिळतो तो, रक्ताचे नाते नसलेल्या व्यक्तीकडून.
    नटसम्राट या नाटकामध्ये आणि प्यासा आपणास मानवी जीवनातील सत्यस्थिती दाखवून देते.जग मानवी नात्यापेक्षा पैश्याला अधिक महत्त्व देते.पैसा असेल तर जग मानदेते.पैसा नसेल तर आपले म्हणवणारे देखील परके कसे होतात.तसेच जगात सर्वत्र वाइटच लोक आहेत असे नव्हे तर जगात कमी प्रमाणात का होईना,चांगल्या व्यक्ती देखील आहेत,हा संदेश आपणास नटसम्राट आणि प्यासामधून मिळतो‌.एका अर्थाने एकच कथा यात दोन वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्यात आली आहे,असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.हे दोघे कलातित सत्यच मांडतात हे तितकेच खरे आहे.

पाकिस्तानमधील राजकीय.सामाजिक, सांस्कृतिक जीवनाचा मागोवा घेणारे पुस्तक, 'कुंपणापलीकडला देश पाकिस्तान'

                      

    आपल्याकडे पाकिस्तानचे नाव निघाल्याबरोबर सर्वसाधारतः वैरभावना जागृत होते आता काश्मीरमध्ये दहशदवादी कारवाया होत नसल्या तरी, या आधी काश्मीर मुद्यावरून झालेली तीन युद्धे बघता, ती बरोबरच म्हणता येईल . मात्र ही  युद्धे तेथील राजकारणी आणि लष्करशाहीने भारतावर लादलेली होती तेथील जनसामान्यांनी भारताबरोबर केलेली युद्धे नव्हती ती. राजशात्राचा विचार करता, सर्वसामान्य जनता आणि शासनकर्ते या दोन्ही एकमेकांना पूरक मात्र एकमेकांपासून पूर्णतः  वेगवेगळ्या  बाबी आहेत.  त्यामुळे त्यांची सरमिसळ करत शासनकर्ते आणि सर्वसामान्य जनता यांची मते एकच आहेत असे समजणे चुकीचे आहे,  एकेकाळी एकाच देशाचा भाग असलेल्या आणि आपल्या भारतात काही वर्षापर्यत दहशतवादी कारवाया करणाऱ्या आपल्या शेजारी  देशाची मोठ्या प्रमाणात माहिती असणे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक ठरते आपणस  माध्यमात येणाऱ्या बातम्यांद्वारे तेथील शासनकर्त्यांची मते समजतात मात्र सर्वसामान्य जनतेची मते समजत नाहीत त्यामुळे आपले पाकिस्तानविषयक मते अपुऱ्या माहितीवर आधारित असतात , असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही मग पाकिस्तानविषयक अचूक मत होण्यसासाठी आपनास सर्वसामान्य जनतेचे मत विचारत घेणे क्रमप्राप्त ठरते   

                    कोणत्याही दोन व्यक्तींचा समाजाचा परस्पर संबंध आल्यास त्या समाजाची अचूक माहिती मिळते आता आपल्या भारतीयांचा आणि पाकिस्तानी समाजाचा थेट संपर्क येणे अवघड पाकिस्तानचा व्हिसा मिळणे भारतीयांसाठी अत्यंत अवघड आहे  मग काय करायचे?  तर जे भारतीय पाकिस्तानला भेट देऊन आले आहेत त्यांचे पाकिस्तानमधील अनुभवांवर आधारित लेखन वाचायचे आणि त्यांचा अनुभवविश्वाशी आपले अनुभ ताडून घेयचे आणि पाकिस्तानबाबत आपली समज अधिक विकसित करायची,  या दुधाची तहान ताकावर भागवायचा प्रक्रियेत
आपल्यास मोठ्या प्रमाणात  मदत करते ते पुण्याच्या श्रीविद्या प्रकाशनतर्फे प्रकाशित आणि मनीषा टिकेकर लिखित 'कुंपणापलीकडला देश पाकिस्तान'  हे पुस्तक जे मी नुकतेच नाशिकमधील सर्वात मोठी सांस्कृतिक संस्था सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या मदतीने वाचले 
             १९९९ साली अमेरिकेच्या फोर्ड फाऊंडेशनतर्फे एशिया फेलोज प्रोग्रॅम जाहीर झाला या प्रोग्राममध्ये आशियाई देशातील नागरिकांना दुसऱ्या आशियाई देशात जावूं तेथील समाजजीववनाचा अभ्यास करता येणार होता याच कार्यक्रमांनातर्गत लेखिकेला सहा महिने पाकिस्तानात जाऊन तेथील समाजजीवन जवळून बघण्याची संधी मिळाली या दरम्यान लेखिकेला जे अनुभव आले ते म्हणजे सदर २४७  पानाचे हे  पुस्तक होय  पुस्तक प्रास्ताविक, पाकिस्तान सांस्कृतिक वीण, पाकिस्तान राजकारणाचा बाज, पाकिस्तान सामाजिक पैलू या चार भागात विभागले आहे सहजा प्रास्ताविकला पुस्तकाचा भाग समजत नाही याही पुस्तकात तसे केलेले नाही मात्र एकूण पुस्तकाच्या पानाचा विचार करता जवळपास १० टक्के भाग (२३ पाने ) हि प्रास्ताविकात व्यापली गेली असल्याने मी  याचा स्वतंत्र्य भाग केला आहे प्रत्येक भाग २ ते ७ प्रकरणात विभागाला आहे . 
        प्रास्ताविकात लेखिकेला पाकिस्तानचा व्हिसा मिळण्यासाठी काय अडचणी आल्या / त्या कोणत्या प्रकारे
सोडवण्यात आल्या .त्यासाठी लेखिकेला भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांची कोणत्या प्रकारे मदत झाली  तसेच व्हिसा मिळवतना वाया गेलेला वेळ फोर्डने कसा माफ केला ? याविषयी सांगितले आहे 
         पहिल्या पाकिस्तान सांस्कृतिक वीण या भागात लेखकेने तिच्या पाकिस्तानमधील वास्तव्यात तिने भेट दिलेल्या इस्लामबाबाद, लाहोर पेशावर कराची, तक्षशिला, रावळपिंडी या शहरांविषयी सांगितले आहे यात फक्त मी येथे या व्यक्तींना भेटले असे सांगितले नसून शहर कसे आहे शहराची ओळख देखील यामध्ये करून देण्यात आलेली आहे प्रत्येक शहराला इतिहासाचा वारसा असतो सांस्कृतिक ओळख असते लेखिकेने आपल्याला तिच्या लेखनात इस्लामबाबाद लाहोर पेशावर कराची तक्षशिला रावळपिंडी येथील ओळख करून देताना याचा आधार घेतल्याचे आपणस समजते प्रास्ताविक वगळून असलेल्या पुस्तकाचा विचार करता, जवळपास निम्मे पुस्तक या भागाने व्यापले आहे. 
      दुसऱ्या भागात अर्थात पाकिस्तान राजकारणाचा बाज या भागात पाकिस्तानमधील लोकशाहीविषयी आणि लष्कराच्या सहभागविवषयी दोन प्रकरणाद्वारे सांगितले आहे , हा भाग पुस्तकातील सुमारे ५० पाने व्यापतो 
तिसऱ्या भागात सुमारे ४० पानांद्वारे लेखिकेने पाकिस्तानी समाजसांस्कृतिक विश्व आणि सर्वसामान्य पाकिस्तानी व्यक्तीला भारताविषयि  काय वाटते याविषयी ३ प्रकरणाद्वारे सांगितले आहे 
   लेखात सुरवातीला सांगितल्याप्रमाणे पाकिस्तानविषयी तेथील समाज जीवांविषयी जाणून घेण्यासाठी हे पुस्तक किमान एकदा तरी वाचायलाच हवे  

रविवार, १ डिसेंबर, २०२४

प्रत्येकाने वाचलेच पाहिजे असे पुस्तक,'सायबर अटॅक'

 सध्याचे जग सातत्याने विकसीत होणाऱ्या तंत्रज्ञानाचे आहे,हे कोणीही  नाकारू शकत नाही. कोव्हिड १९ च्या साथरोगानंतर तर आपल्या आयुष्यातील त्याचा वापर अजुनच वाढलेला आहे, आणि आर्टिफिशियल इंटेलिजियन्स क्षेत्रातील प्रगतीमुळे तो अधिकाधीक वाढतच जाणार आहे,हे सुद्धा नाकारता येणे अशक्य.त्यामुळे तंत्रज्ञान स्नेही असणे सध्याचा काळात अत्यंत आवश्यक आहे.जर आपण काळानुरुप बदललो नाही तर  कोडॉक, नोकिया या एकेकाळच्या डॉन  म्हणता येईल, मात्र आज अस्तिवासाठी  लढणाऱ्या कंपन्यासारखे नष्ट होवू
   तंत्रज्ञानाचाच फायदा घेत त्यात पारंगत होण्याचा विचार केला असता,आपली फसगत होण्याचा धोका देखील मोठा प्रमाणात आहे. ऑफलाईन जगात ज्याप्रमाणे चांगले लोक  आहेत वाईट लोक आहेत.तोच प्रकार ऑनलाईन जगात आहे. ऑफलाईन जगात व्यक्ती समोर असल्याने त्याचा देहबोलीतून आपण सदर व्यक्ती चांगली की वाइट हे ओळखु शकतो‌.मात्र तंत्रज्ञानाचा जगात ऑनलाईन पद्धतीने संवाद साधणारी व्यक्ती समोर नसल्याने, सदर व्यक्ती चांगल्या हेतूने संवाद साधत आहे की, त्याचे हेतू वाइट आहे.हे समजत नाही. सध्या गाजत  असणारे 'डिजीटल अरेस्ट'  हे फसवणूकीचे प्रकार हे या धोक्याचे एक उदाहरण म्हणता येईल.मात्र लेखाच्या सुरवातीलाच सांगितले त्या प्रमाणे आपल्याला आपले जीवन  तंत्रज्ञान स्नेही सध्या काळाची गरज आहे. या कात्रीतून मार्ग काढायचा असल्यास आपणाला विश्वासार्ह्य मार्गदर्शकाची गरज निर्माण होते, आणि ही गरज आपली सहजतेने पुर्ण होते.ती राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि डॉ.संजय तुंगार,आणि सुधीर साबळे यांनी एकत्रीतपणे लिहलेल्या, 'सायबर अटॅक' या पुस्तकामुळे.
नाशिकमधील सर्वात जूने वाचनालय असलेल्या सावाना अर्थात सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या मदतीने मी सदर पुस्तक नुकतेच वाचले.
या पुस्तकात सध्या विशेष चर्चेत असलेल्या ,तूमच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे, ही भुलथप तसेच हनी  ट्रॅप, व्हाटसप हॅक होणे,धर्मांतराचा खेळ, ऑनलाईन गेमचे मोहजाल, डेबीट कार्ड क्लोनिंग,सेक्शटार्शन  ,झूम मिटिंगद्वारे होणारी,फिशिंगद्वारे होणारी,टिंडर सारख्या प्लॅटफॉर्म होणारी फसवणूक, ऑनलाईन कर्जाद्वरे फसवणूक, कशी होते,त्यापासून कोणत्या प्रकारे बचाव करावा, ऑनलाईन जगात अती घाई कशी अडचणीची ठरते.तसेच ऑनलाईन जगात क्लिक करताना,काय काळजी घेयला हवी, ऑनलाईन सुविधेमुळे घर सोडून गेलेल्या व्यक्ती कोणत्या पद्धतीने सापडू शकतात ,या सारख्या सुमारे 35 गोष्टी वेगवेगळ्या प्रकरणाद्वारे सांगण्यात आलेल्या आहेत.पुस्तक तांत्रीक माहिती देत असले तरी पुस्तकाची भाषा सहजसोपी चटकन समजणारी आहे.पुस्तकाच्या शेवटी तीन परिशिष्टाद्वारे सायबर गुन्हेगारीबाबतची भारतातील सद्यस्थिती, आपल्याबाबत सायबर गुन्हा घडल्यास कोणती पाउले उचलावीत,तसेच पोलीस स्टेशन आणि बँकेला कोणत्या स्वरूपात अर्ज करावा याबाबत सांगण्यात आले आहे.

   या पुस्तकाच्या दोन लेखकांपैकी एक असणारे  डॉ.संजय तूंगार हे पोलिस दलात कार्यरत आहेत.डॉ. तुंगार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील आयक्तलयात कार्यरत असताना, तेथील सायबर ठाण्याचे काम बघीतले.या दरम्यान त्यांनी अनेक गुन्ह्मांची उकल केली आहे.सायबर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधिकारी
कर्मचारी यांना विशेष प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रमात, एस.ओ.पी.तयार करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता .तर दुसरे लेखक सुधीर साबळे  हे ज्येष्ठ पत्रकार आहेत.त्यांना पत्रकारीतेचा २५वर्षाचा अनुभव आहे. सुधीर साबळे यांनी पत्रकारीता करताना, सायबर गुन्हांविषयी मोठ्या प्रमाणात वार्तांकन केले आहे तसेच सायबर गुन्हे याबाबत त्यांनी अनेक प्रबोधनपर लेख आणि कथा लिहल्या आहेत. दोन्ही लेखकांना सायबर गुन्हे याबाबत असे सविस्तर ज्ञान असल्यामुळे पुस्तक अत्यंत माहितीपुर्ण झाले आहे.त्यामुळे डिजीटल अरेस्टया सारख्या फसवणूकीची बातमी आपल्याबाबत प्रसिद्ध होवू नये असे वाटल्यास पुस्तक नक्कीच वाचा.




मी कोणती पद्धत वापरुन पुस्तके निवडतो (माझे वाचन भाग ८)

माझ्या कालच्या लेखावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या त्याबाबद्दल माझा लेख वाचणाऱ्या,यावर प्रतिक्रिया देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. या प्...