अस्या या बहुधंगी, बहुरंगी देशाचे प्रशासन चालवणे मोठे कष्टाचे काम. त्यासाठी विस्तृत अशी यंत्रणा उभारणे आलेच. ही यंत्रणा सुरळीत चालवण्यासाठी नियम सुद्धा आलेच. भारतीय संविधानाचा कलम 304 ते 314 मध्ये ते सुद्धा आहेतच. मात्र हे प्रशासन ज्या सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी भल्यासाठी प्रगतीसाठी झटणार आहे. त्यांना या प्रशासनाचा फायदा होतो की जाचच ठरतो आहे. हा मात्र प्रश्न अनुत्तीतच राहिला आपल्या भारतात. प्रशासन खरंच लोकांना उत्तरदायित्व आहे का ? हा प्रश्न मात्र कधीच विचारात घेण्यात आला नाही. लोकही सरकारी काम आणि सहा महिने थांब असे म्हणत शांत बसत असतात. प्रशासनाचे काम व्यवस्थित चालावे म्हणून त्यांना काही सवलतीदेण्यात आल्या, मात्र या सवलतीचा गैरफायदा घेत स्वतःचेच फायदे करून घेणारी लोकं या प्रशासन व्यवस्थेत आली.ज्या सर्वसामान्य लोकांसाठी हे प्रशासन आहे ती मात्र दूरच राहिली. कविवर्य कुसुमाग्रजांनी त्यांच्या सुप्रसिद्ध अस्या 'स्वातंत्र्यदेवची विनवणी' या फटका प्रकारातील काव्य प्रकारात तसे सांगितले सूद्धा , जनसेवेस्तव असे कचेरी डाकूंची ती गुहा नसे .मेजा खालूनी मेजा वरतूनी द्रव्य कुणाचे लुटू नका. प्रशासनातील बहुसंख्य यंत्रणेला त्याचा बहुदा विसरच पडला
आपल्याला समुद्रात एखादा हिमनग तरंगताना दिसतो. तो वरती जेवढा असतो त्याचा नऊ पट खाली असतो असे म्हणतात. कोणत्याही कर्तृत्वान माणसाच्या बाबत असेच म्हणता येऊ शकते त्याचे कर्तुत्व आपल्याला जेवढे दिसते त्याच्यापेक्षा नऊ पट कष्ट त्यांनी घेतलेले असतात जे आपल्यापासून अनेकदा दूरच राहतात. सामान्यपणे लोक त्याच्या वरवर दिसणाऱ्या रूपाकडे बघत त्याच्या अनुकरण करण्याचे प्रयत्न करतात मात्र त्यासाठी त्याने घेतलेले कष्ट हे लोकांना फारसे कळतच नाहीत त्यामुळे होतं काय लोक त्यासारखं होण्याचे प्रयत्न करतात मात्र होत नाहीत हे टाळायचं असेल आणि माणसाची एक साखळीच निर्माण करायची झाल्यास त्याकरता माणसाने घेतलेले कष्ट जनतेसमोर आलेच पाहिजे.
सध्या चॅट जीपीटी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या बोल बाला असला तरी पुस्तकाचे महत्व अजूनही अनन्यसाधारण आहे. मी आधी सांगितले, त्याप्रमाणे कर्तृत्वान माणसाचे कष्ट समोर येण्यासाठी पुस्तकांखेरीज अजूनही प्रभावी आणि उत्तम मार्ग अस्तित्वात नाहीये आणि हेच लक्षात घेत सध्या विशेष चर्चेत असणारे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या यांच्या आत्तापर्यंतचा जीवन प्रवास उलगडतो तो शफी पठाण यांनी लिहिलेल्या तुकाराम या पुस्तकातून.न्यू एरा या पब्लिकेशनच्या या पुस्तकात आपणास त्यांनी कोणकोणत्या अडचणींना तोंड देत भारतीय प्रशासन सेवेत प्रवेश केला त्यांच्या प्रोबेशन पिरीयड मध्ये त्यांनी केलेले काम, त्यांना भारतीय प्रशासन सेवेत यावेसे का वाटले ? त्यासाठी त्यांना कोणी कोणी आणि कोणत्या प्रकारे मदत केली ? तसेच भारतीय प्रशासन सेवेत येण्यासाठी आवश्यक असणारी जीवन कौशल्य त्यांनी कोणत्या पद्धतीने आत्मसात केली हे समजते
216 पानांच्या या पुस्तकाचे आपण तीन भागात तुकडे करू शकतो पहिल्या भाग हा 108 पानांचा आहे. दुसरा भाग हा पुढील 54 पानांचा आहे तर तिसरा आणि शेवटचा भाग सुद्धा 54 पानांचा म्हणता येऊ शकतो. ज्यांना गणित समजतं त्यांना हे लगेच लक्षात येईल की 216 चा अर्धा भाग म्हणजे 108 आणि 108 चा अर्धा भाग म्हणजे 54 म्हणजेच पहिला भाग अर्धा पुस्तक. त्या पुढील दुसरे आणि तिसरे भाग हे पाव पाव भाग व्यापतात. अर्थात हे शफी पठाण यांनी ठरवून केलेला आहे की लेखनाच्या ओघात झालेला आहे हे त्यांनाच माहिती. मात्र हे भाग झालेले आहेत हे नक्की, आणि ते वाचताना लक्षात सुद्धा येतात. तर पहिल्या भागात आपणास तुकाराम मुंढे यांच्या दहावीपर्यंतच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेता येतो. दुसऱ्या भागात त्यांच्या अकरावी पासून ते यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यापर्यंतचा प्रवास शफी यांनी मांडलाय तिसऱ्या भागात त्यांच्या प्रोबेशन काळातील आढावा घेण्यात आला आहे.बीड जिल्ह्यातील ताडसोन्ना या छोट्या गावातील सामान्य कुटुंबातून सुरू झालेला तुकाराम मुंढे यांचा प्रवास अनेक अडचणींवर मात करत भारतीय प्रशासकीय सेवेत पोहोचतो. आर्थिक परिस्थिती, मर्यादित साधने आणि ग्रामीण पार्श्वभूमी या अडथळ्यांवर मात करून त्यांनी शिक्षण पूर्ण केले यामध्ये त्यांनी क्षेत्रफळाचा विचार करता मोठी म्हणता येईल अशी मात्र पाणी नसल्याने फारशी उत्पादन न देणारी शेती कशी केली ?वडिलना त्या शेतीमध्ये मदत कशी केली शेतीच्या अडचणी पार करत शिक्षण कसे केले ? याची माहिती पहिल्या भागात मिळते. दुसऱ्या भागात त्यांनी त्या वेळच्या औरंगाबाद आत्ताच्या छत्रपती संभाजीनगर या शहरात राहून कष्ट घेत कसे शिक्षण पूर्ण केले ? यूपीएससीची तयारी कशी केली ? त्यासाठी पुणे मुंबई आदी ठिकाणी कोणत्या संस्थेत आणि कोणत्या प्रकारे प्रवेश मिळवला ? यादरम्यान आलेल्या अडचणींवर नैराश्यावर कोणत्या प्रकारे मात केली?. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना त्यांनी पैशाची तरतूद करताना तसेच येणाऱ्या अपयश बघत करिअरमधील अन्य कोणते मार्ग निवडण्याचा प्रयत्न केला का केला असल्यास ते कसे निवडले ?त्यासाठी काय काय विचार केला? याची माहिती मिळते. मुंडेंविषयी बातमी वाचताना आपल्याला त्यांच्यातील स्पष्टवक्तेपणा, कठोर शिस्त, पारदर्शकता आणि नियमांची काटेकोर अंमलबजावणी या गुणांची जाणीव होते हे गुण त्यांनी कोणत्या पद्धतीने आत्मसात केले याची माहिती आपणास प्रामुख्याने दुसऱ्या भागात होते. अर्थात पहिल्या भागात याचा ओझरता उल्लेख होतोच.
तिसरा भागाविषयी बोलायचं झाल्यास मुंढे यांच्या प्रशासकीय कारकिर्दीत घेतलेले कठोर निर्णय आणि भ्रष्टाचार अथवा गैरप्रकारांविरोधातील भूमिका यामुळे ते अनेकदा चर्चेत राहिले. त्यांच्या वारंवार झालेल्या बदल्याही त्यांच्या कारकिर्दीचा महत्त्वाचा भाग ठरल्या. मात्र प्रत्येक नव्या ठिकाणी त्यांनी आव्हान म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि कामाला प्राधान्य दिले.याविषयी माहिती मिळते.
स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या व्यक्तींनी मिळणाऱ्या सोयी सवलतींमुळे हुरळुन न जाता वास्तव्याची जाण येण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा